Pages

Tuesday, May 18, 2010

गोष्ट एका गूढाची

"अर्धा तास झाला... पण कोणी दार ऊघडत नव्हतं. तो एवढा गाढ कसा काय झोपला होता? जागरण झालं होतं का त्याला? काहीच कळत नव्हतं... तारीख होती १३ जून. ढग दाटून आले होते. सकाळचे ९ वाजले होते तरी काळो़खी होती. सोसाट्याचा वारा आणि बोचणारी थंडी. इतकावेळ दार ठोठावून, बेल वाजवूनही तो का दार ऊघडत नव्हता? त्याचा मोबाईलही बंद होता. आमच्या मनात ऊगाचच नको नको ते विचार येत होते.

शेवटी, आम्ही कडी तोडण्याचा निर्णय घेतला. जुन्या बनावटीच्या, सागवानी लाकडाच्या दरवाजावरची, मजबूत लोखंडी कडी तोडणं काही सोपं नव्हतं. एव्हाना आजुबाजूचे लोकही जमा झाले होते. इथे रहात असलो तरी हे शहर आम्हाला आणि आम्ही या शहराला परके होतो. त्यात बॅचलर्स असल्यामुळे सगळ्यांना नकोसे होतो........



एव्हाना प्रचंड पावसाला सुरुवात झाली होती. घराच्या दारावर दहा-बारा लाथा मारल्यावर खट्ट करून एकच आवाज झाला आणि कडी तुटली. कर्र कर्र आवाज करत दरवाजा उघडला. आत कोणीच दिसत नव्हतं. आत जायची हिम्मतही होत नव्हती. शेवटी मी आणि राकेशने आत पाऊल टाकले................"

"सागर, अरे गेल्या एक दीड महिन्यात आम्ही कुठल्या दिव्यातून जातोय ते सांगायला सुद्धा मला भीती वाटतेय...".... मी.

"तू सांग रे पुढे... मला हे सगळं माहित असणं महत्वाचं आहे..".... सागर.

"ठीक आहे...ऐक मग....."....मी

".............. हॉलमधलं सगळं सामान जागच्या जागी होतं. पण तो काही दिसत नव्हता. आतमध्ये बारीक चिरक्या आवाजात "मर्मबंधातली ठेव ही...." ऐकू येत होतं.. Mostly त्याचा PC चालू होता... बेडरूमध्ये जायचं काही धाडस होत नव्हतं. पण जाणं भाग होतं. बेडरूमचं दार नुसतं लोटलेलं होतं. मनातले सगळे विचार बाजूला ठेवून शेवटी आम्ही बेडरूमचं दार उघडलं.......... आणि जे पहायचं नव्हतं नेमकं तेच पहावं लागलं.

कुणाल.... आपला कुणाल......जमिनीवर पडला होता. त्याच्या सगळ्या शरीरावर कसलेतरी डाग पडले होते....

"सायनाईड खाऊन एका तरुणाची आत्महत्या." कुणाल गेल्यानंतर तिसर्‍या दिवशी वर्तमानपत्रातल्या एका छोट्या कोपर्‍यात त्याला जागा मिळाली होती. गेल्याच महिन्यातली, राहुलची घटना ताजी असताना हा दुसरा प्रकार घडला होता. होय राहुलनेही आत्महत्या केली होती. विष खाऊन.

डोकं सुन्न झालं होतं. त्यात पोलिसांनीही प्रचंड त्रास दिला. आम्हाला, त्यांनी दिवसभर कोठडीत ठेवलं होतं. आम्ही दरवाजा का तोडला या प्रश्नावरून त्यांनी अक्षरशः शिवीगाळ केली. आता त्यांना कसं पटवणार की "राहुलची घटना ताजी असताना आम्हाला फक्त आमचा मित्र सुखरूप आहे ना एव्हढंच पहायचं होतं ते?"

पोस्टमोर्टेमच्या रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण "Consumption of hydrogen cyanide, causing cardiac arrest." असं होतं. "Time since death" होता १३ ते १५ तास.

तो साला पोलिस..... जाधव..... सब-इंन्स्पेक्टर जाधव.... कुणालला सारखं "बॉडी" म्हणत होता. अरे, या पोलिसांना कशाचच काही वाटत नाही का? किती निर्लज्जपणा??

पोलिस स्टेशनमधून बाहेर आलो तरी डोळ्यासमोर कुणालचा चेहरा सारखा येत होता.....अगदी एका महिन्यापूर्वी आमची हीच गत झाली होती. पण तेव्हा कुणाल होता आमच्याबरोबर.....

१२ मे ला राहुलने विष खाऊन आत्महत्या केली.... सागर, तू राहुलला ओळखत नसावास. राहुल हा मुळचा कुणालचा मित्र. गेल्याच वर्षी कुणालने त्याच्याशी आमची ओळख करून दिली होती. IIM-A मध्ये मॅनेजमेंट करून तो मॉर्गन मध्ये मॅनेजरच्या पोस्टवर होता. अगदी बक्कळ कमवत होता. पैसा आणि पर्सनॅलिटीमुळे त्याला कसलीच कमी नव्हती. तो अत्यंत हुशार आणि सर्वांमध्ये डॅशिंग... अगदी एका वर्षातच तो आमचा चांगला मित्र झाला होता. तो एकदम सुव्यवस्थित होता. म्हणजे काटेकोर का काय म्हणतात तसा. त्याची प्रत्येक गोष्ट प्लान केलेली. म्हणजे, येत्या सहा महिन्यात काय काय काम करायचं इथपासून ते अगदी दिवसातून किती वेळा आणि किती वाजता फोनवर बोलायचं इथपर्यंत. प्रत्येक गोष्ट टापटीप आणि जागच्या जागी. एकंदरीत त्याचं एकदम छान चाललं होतं. पण त्याने अचानक आत्महत्येचा निर्णय का घेतला हे मात्र कोडंच.... जेव्हा आम्हाला तो गेल्याची बातमी कळली तेव्हा अगदी हातपाय गळल्यासारखं झालं होतं रे. राहुलचं ते थंड शरीर पाहून आमचं डोकं चालेनासं झालं होतं.....

राहुलच्या अंत्यविधीसाठी जेव्हा आम्ही त्याच्या गावी गेलो, तेव्हा कुणालने हळूच आम्हाला सांगितलं, "राहुल आत्महत्या करणं शक्य नाही." कुणालला राहुलने आत्महत्या केली हे पटतच नव्हते. शेवटी खूप जवळचा मित्र होता तो त्याचा. त्यावेळी त्याची स्थिती आम्ही समजू शकत होतो आणि या विषयावर तिथे काही बोलण्यातही अर्थ नव्हता.

आम्ही शहरात परत आलो आणि आपापल्या कामाला लागलो. दुसर्‍या दिवशी कुणालने आम्हाला त्याच्या घरी बोलावलं. मे महिना चालू होता, संध्याकाळ होत आली होती, प्रचंड वारा सुटला होता आणि आकाशात एका बाजूला काळे ढग दिसू लागले होते. आज काही वेगळंच हवामान होतं. राकेश, अभिजीत, मी आणि कुणाल त्याच्या हॉलमध्ये बसलो होतो.

"राहुल आत्महत्या करणं शक्य नाही.." कुणाल परत म्हणाला. त्याला कसं समजवायचं ते मात्र आम्हाला कळत नव्हतं.

"अरे... पोलिसांनीही त्याची केस "आत्महत्या" म्हणून बंद केलीय" राकेश म्हणाला.

आपला राकेश UICT चा केमिकल इंजिनीर. तो सगळ्यात घाबरट आहे. एकदा तो घाबरला की ऊगाच वायफळ बडबड करतो....पण, अशी माणसं अभ्यासात चांगली असतात. त्याच्याकडून अभ्यास सोडून कुठलीच गोष्ट सरळ होत नाही. शाळेत तो कायम पहिल्या तीनात असायचाच. पण प्रॅक्टिकली विचार करणं त्याला जमतच नाही. वेंधळा हा शब्द त्याच्यासाठी बरोबर ठरेल.

आणि कुणाल त्याच्या बरोब्बर ऊलटा.. तो प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करायचा. कोणी काही बोललं, तर आपण त्या गोष्टीशी किती रिलेटेड आहोत ते बघायचा. जेवढे टक्के Relation तेवढंच Interaction. तो स्वतःहुन कुणाशी बोलायला जायचा नाही आणि दुसर्‍याला फारसं जवळ करायचा नाही. त्याच्या मनात काय चाल्लय हे कधीच कोणी सांगू शकलं नाही. कामापुरतं बोलायचं बास्स. कुणी त्याच्या पर्सनल गोष्टींबद्दल विचारलं... तर "None of your business..!!" एव्हढच उत्तर असायचं. पण राहुल गेल्यापासून तो फारच बदललेला वाटत होता. त्याने स्वतःच आम्हाला त्याच्या घरी बोलावले होते. कुणाल IBM मध्ये नुकताच सिनिअर सॉफ्टवेर इंजिनीर म्हणून लागला होता.......

"राहुल एव्हढा जॉली होता... त्याचा कोणी शत्रू असेल असं मला तरी वाटत नाही. त्याच्या घरच्यांनाही आता पटलयं की त्याने आत्महत्या केली." अभि म्हणाला.

अभिजीत पुरता भांबावला होता. प्रसंगच तसा होता. एका मित्राने आत्महत्या केली होती आणि दुसरा म्हणत होता की ती आत्महत्या नव्हती !!

अभिजीत.. आपला अभि.....फक्त B.Sc. झालाय. ऊंच, गोरा, सरळ नाक.. झकास पर्सनॅलिटी आणि खिसा भरायला बापाचा पैशांचा रहाट. तोंडात सतत सिगरेट, कधी कसलीच फिकीर नाही..... अभिच्या डोक्यात नेहमी काहीतरी विचित्र चालू असतं. त्याचे कसले भलतेच छंद असतात आणि नेहमीप्रमाणे ते छंद बदलत असतात. गेल्या दोन वर्षांतलं त्याचं वेड म्हणजे "साप". दर विकेंडला कुठे कुठे जाऊन तो साप पकडत असतो. त्याचं कुणालशी तसं फारसं कधीच पटलं नाही. त्याची बेफिकीरी हेच त्यामागचं मूळ कारण. तसे शहरातल्या आमच्या ग्रुपमध्ये १०-१२ जणं होते. पण कुणालने आम्हा तिघांनाच का बोलावलं हे काही कळत नव्हतं. मी त्याचा अगदी जवळचा मित्र. पण तो भित्रा राकेश आणि खासकरून तो विचित्र अभिजीत, यांना हे सगळं सांगण्याचा त्याचा उद्देश काय होता? राहुलने विष खाऊन आत्महत्या केली होती...... म्हणून हा नाठाळ सर्पमित्र पाळायचा?? ..... छे.. काही कळत नव्हतं.

बरं...सागर्‍या, तसं तुला आमच्याबद्दल सगळंच माहिती आहे.... पण इतके वर्ष अमेरिकेत होतास.....म्हटलं, विसरला असशील आम्हाला.......म्हणून आपलं सांगितलं...."

सागरः "अता पुढे सांगतोस का शिव्या घालू??"

मी: "अरे सॉरी...गंमत केली... गेल्या दीड महिन्यात एव्हढीही गंमत केली नाही रे कोणाची..... बरं, ऐक पुढे............"

"..................हे बघा, आपण राहुल गेल्यावर जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याच्या शेजार्‍यांनी मला सांगितलं की, राहुलने दार घट्ट लावलं होतं...पण दाराला आतून कडी मात्र नव्हती." कुणाल म्हणाला...

"त्याने दाराला आतून कडी नाही लावली म्हणून ती आत्महत्या नाही??" मी म्हणालो...

"राहुल गेला त्याच दिवशी सकाळी त्याचा मला फोन आला होता... विकएंडला भेटू असं म्हणत होता तो....."... कुणाल म्हणाला..

"काहीतरी झोल झाला असेल मधल्या वेळात आणि म्हणून........" अभि पुढे काही बोलण्याआधीच मी त्याला हळूच पाय मारून गप्प केलं...

"हे बघा.. मी असं १०० टक्के सांगत नाही की त्याने आत्महत्या केली नाही... पण ज्या माणसाचं सगळं व्यवस्थित चाललयं तो असा टोकाचा निर्णय का घेईल?".. कुणालचा आवाज चढला होता...

"आणि हो... राहुल लोकांसारखे 'झोल' करणारा माणूस नव्हता...." कुणालने अभिला एक पंच मारून घेतला.....

"अरे.. श्रीमंत लोकांच्या भानगडीत कशाला पडायचं आपण? आपल्यासमोर तो व्यवस्थित असायचा म्हणून त्याला टेन्शन्स नव्हती असं नाही... आणि त्यात आपण शेरलॉक होम्स नव्हे. पोलिसांना काही कळलं, तर आपलं नरडं दाबतील पहिलं...." राकेश म्हणाला...

"मी या शनिवारी परत एकदा राहुलच्या घरी जाणार आहे.... आपण एक मित्र गमावलाय...Come on... तुम्हाला कळतय का मी काय म्हणतोय ते....तुमच्यापैकी कोणी येणार आहे का??" कुणालचा आवाज कापरा झाला होता....

कोणीच काही बोलत नव्हतं... कुणालला खूळ लागलं होतं...आणि त्याला तिकडे एकटं जाऊ देणंही शक्य नव्हतं.

"काय वेड लागलय का तुला? या असल्या मूर्खपणाचा मी अजिबात वाटेकरी होणार नाही... तुम्हाला काय करायचं ते करा....पण याच्या नादाला लागू नका...." अभि वैतागून म्हणाला...

"चूकच केली मी तुला बोलावून... नाही आलास तर बरच होईल..." कुणाल...

पुढे काहिही न बोलता अभि निघून गेला...

शनिवार अजून ऊजाडला नव्हता आणि आम्ही तिघेही कुणालच्या घरी होतो...होय... अभि पण आला होता... अभि आणि कुणालने एकमेकांकडे फक्त एक नजर टाकली......

"कुणाल खरच जायच का तिथे?? " राकेशची अक्षरशः फाटली होती...... " कुणालने रागानेच त्याच्याकडे पाहिलं. त्याचे मोठे घारे डोळे बघून कोणाचंही तोंड गप्प होयचं......

तर, पहाटे साडे-तीन वाजता आम्ही बाईक काढून निघालो. कुणालने त्याच्याबरोबर एक बॅग घेतली होती. काय होत कुणास ठाऊक त्यात. नक्कीच कुणालला काहितरी ठाऊक होतं आणि तो आम्हाला ते सांगत नव्हता.

राहुलचं घर शहराच्या एका कोपर्‍यात, "खंजीरघाटी" नावाच्या भागात आहे. नावाप्रमाणेच तो भाग भीतीदायक आहे. तिथे फारशी घरे नाहीत. एक घाटी आहे आणि खूप दाट झाडी आहे बस्स. दिवसा देखील तिथे फारशी लोकं दिसत नाहीत. त्यामुळे एव्हढ्या पहाटे तिथे कोणी असण्याचा प्रश्नच येत नव्हता.

आम्ही जस जसे खंजीरघाटीच्या दिशेने जाऊ लागलो तस तशी वस्ती विरळ होऊ लागली. थोड्याच वेळात आम्ही राहुलच्या घराजवळ होतो. कुणाला काही कळू नये म्हणून घरापासून जवळपास दोन-एकशे मीटर लांब, घरापासून दोन-तीन वळणे सोडून आम्ही गाड्या ऊभ्या केल्या आणि तिथून पुढे चालायला सुरूवात केली.

मीट्ट काळोख होता. आसपासच एक रातकिडा किरकिर करत होता. मध्येच कुठूनतरी काजवा चमकत होता. वातावरणात एक वेगळाच सुगंध पसरला होता. रस्त्यावर भरपूर पाचोळा होता. अगदी अलगद चालल्यावरही भयानक अशी सळसळ होत होती..... मोबाईलच्या प्रकाशात आम्ही पुढे जात होतो.

पहिल्या वळणानंतर एक घर होतं. राहुलच्या दोन शेजार्‍यांपैकी एकाचं. अगदी सावधपणे आम्ही पुढे जात होतो. सगळे खूप घाबरलो होतो. फक्त एका मोबाईलचा प्रकाश. पण आता काही झालं तरी पुढे जावंच लागणार होतं. पुढच्या वळणावर एक छोटासा ओढा होता. खळखळणारं पाणी ते वातावरण अजून भीतीदायक करत होतं. एव्हढ्यात शेजारच्या पाचोर्‍यात काहीतरी सळसळ आवाज झाला....... "घाबरू नका अधेलंच आहे..." अभि अगदी हळू आवाजात म्हणाला. काळोखात एकमेकांचा चेहराही धड दिसत नव्हता आणि हा माणूस सांगत होता "अधेलंच आहे" ..... असो... आमच्यापेक्षा चार साप जास्त बघितलेला माणूस होता तो. अधेलं विषारी नसलं तरी तो एक सरपणारा प्रचंड साप आहे एव्हढच आम्हाला माहिती होतं......अत्तापर्यंत सगळ्यांचीच फाटली होती...

झपझप पावलं टाकत आम्ही पुढे गेलो. एकच मिनिटात आम्ही राहुलच्या घरासमोर होतो. घर कसलं बंगला होता तो. मी दुसर्‍यांदा जात होतो तिथे. एवढ्या घरात राहुल एकटाच रहात असे... भाड्याने... त्याला असं रहायला आवडत असे. शहरापासून दूर असल्याने तिथे हवी-हवीशी शांतता होती.... ती फक्त त्या वेळी मला अगदी नकोशी वाटत होती.... आवाराला दगडाचं कुंपण आणि एक मोठं गेट होतं... माहित नाही कसं पण गेटला कुलुप नव्हतं. गेट ऊघडताना जो काही आवाज झाला त्यानं सगळ्यांची धडधड क्षणभर थांबली. जरासच गेट ऊघडून आम्ही एक-एक करून आत गेलो. घरासमोर मोठं अंगण होतं. अंगणावाटली झाडं होती...... एव्हढ्यात जोराचा वारा सुटला.... आणि सगळ्यांचा अक्षरशः थरकाप ऊडाला... बाजूच्या बांबूच्या वनातनं जो बांबूचा आवाज झाला तो अजून आठवतोय मला.... हातावर शहारे आलेत बघ.... तो... राहुल तिथे कसा रहायचा देवासच ठाऊक...

घरामागून अंधूकसा प्रकाश येत होता. आम्ही आत कसं जायचं ते बघू लागलो.. इथे पहिल्यांदा आम्ही वेगवेगळे झालो होतो. कुणाल आणि राकेश घराच्या डाव्या बाजूने... मी आणि अभि ऊजव्या बाजूने. अचानक डोक्यात विचार आला.... "आपण हे काय करतोय??... हे आपलं काम नव्हे.... आपला मित्र गेलाय आणि आपण त्याच्या घरात घुसतोय??... पण समजा आत गेलो आणि काही मिळालं... तर पुढे काय??... आणि आत जाऊन नक्की करायचय काय??... हा कुणाल नक्की कशाला आपल्याला चोरासारखं आत नेतोय??....." असे बरेच "का? काय? कुठे? कशाला?" डोक्यात येत होते...

"या खिडकीतून आत जाता येईल.." अचानक अभि म्हणाला..."मी येतो त्या दोघांना घेऊन..." आणि तो त्या अंधारात नाहिसाही झाला. त्या मीट्ट काळोखात....त्याच जागी जिथे राहुल गेला होता तिथे मी एकटा होतो.... बापरे............

एव्हढ्यात समोर लाईट चमकला. मी फक्त मरायचा बाकी रहालो होतो... पण समोरून कुणाल आणि राकेश येत होते....तो त्यांच्या मोबाईलचा प्रकाश होता.... ते घराला पूर्ण फेरी मारून आले होते. त्यांना खिडकीचा रस्ता दाखवल्यावर कुणालने काही विचार न करता आत ऊडी मारली. त्याच्यामागून राकेशही गेला.
पाच सहा मिनिटं झाली तरी अभि काही परतला नव्हता. एव्हढ्यात खांद्यावर थाप पडली. मला माहित होतं की तो अभि आहे पण तरिही...... "I was scared to death...."

लगेचच आम्ही घरात शिरलो. कुणालने त्याच्या बॅगमधल्या दोन मोठ्या टॉर्च बाहेर काढल्या होत्या. "चुकुनसुद्धा दारं किवा खिडक्यांवर टॉर्च मारू नका... अर्ध्या तासाच्या आत आपल्याला इथुन निघायचय..." असं कुणालने बजावलं... बंगला दुमजली होता. राहुलचा मृत्यू वरच्या मजल्यावरच झाला होता.

कुणाल टॉर्च घेऊन सरळ वरच्या मजल्यावर गेला. माझा काही धीर होत नव्हता. मी मोबाईलच्या प्रकाशातच जे काही दिसत होतं ते बघत होतो. पाचच मिनिटात कुणाल खाली आला. तो घाबरलेला वाटत होता.. "काय रे काय झाले?" राकेशने त्याला विचारलं. माझा अंदाज बरोबर निघाला. राहुलने आत्महत्या केली नाही.... थोड्यावेळ भयानक शांतता पसरली. पोलिसांनी "Post Mortem....Investigation" वगैरे सगळं करून "आत्महत्या" ठरवलेला मृत्यू... एक साधा सॉफ्टवेर इंजिनीर फक्त पाच मिनिटं काहीतर बघून म्हणतो ती आत्महत्या नाही???

काहीच कळत नव्हतं.... "चला पटपट... आधी घरी जाऊ आणि मग बोलू.."....कुणाल म्हणाला.... तसं तिथे कोणालाच थांबायचं नव्हतं....पण राहुलच्या मृत्यूचे रहस्य घरी पोहोचेपर्यंत आम्हाला मारणार होते...

सगळं सामान बॅगेत घालून कुणाल खिडकीतून बाहेर पडलाही. मागोमाग आम्हीही सटकलो. कॅमेरा अजून चालूच होता. बॅटरी संपत आली होती. राहुलच्या घरामागून जो अंधूक प्रकाश येत होता तो जवळपास ५० मी. अंतरावर असलेल्या त्याच्या दुसर्‍या शेजार्‍याच्या घरातल्या अंगणातल्या दिव्याचा होता. घरात काही हालचाल नव्हती...

"कॅमेरा? तू तुझा कॅमेरा घेऊन गेला होतास???..."....सागर.

"हो.... त्या तिघांनाही माहित नव्हतं की माझ्याकडे कॅमेरा आहे ते..... म्हटलं काहीतरी वेगळं करतोय तर घेऊन जाऊया... आणि आपला छंदच आहे तो...."

सागरः "आता मी काय बोलणार यावर?..... पण एका अर्थाने बरं केलस तो कॅमेरा नेलास ते....बर पुढे सांग...."

मी: ".... आम्ही परत बाईक्स कडे चाललो होतो....आता पावले झपझप चालत होती. कुठल्याही अनोळखी ठिकाणी जाताना अंतर फार जास्त वाटतं... पण त्याच वाटेवरून परत येताना ते खूप जवळ वाटतं......आणि यावेळेस तर ते जास्तच जवळ वाटत होतं..... हा हा म्हणता आम्ही बाईकच्या जवळ पोचलोही...

पुढचा अर्धा तास कुणीच कुणाशी बोललं नाही. गाडी कधी शंभरावर पोचली कळलही नाही.... आम्ही थेट कुणालच्या फ्लॅटवर पोचलो... मी कॅमेरा सुरू केला...अर्थात कोणाच्या नकळत.....

कुणालने बोलायला सुरूवात केली.

"खिडकीतून जेव्हा आपण आत ऊडी मारली...... "

क्रमशः

20 comments:

  1. mastch ahe ---ajun kiti bhag ahet-----navin pudhacha bhag kevha vachin ase zalay

    ReplyDelete
  2. sahi zalay he....faar baaaap....pudhacha bhag lavkar taaak....कुठल्याही अनोळखी ठिकाणी जाताना अंतर फार जास्त वाटतं... पण त्याच वाटेवरून परत येताना ते खूप जवळ वाटतं....too goood!

    ReplyDelete
  3. Nice write up! Please put the next part ASAP. Before the curiosity you have created melts down.

    ReplyDelete
  4. kavi jhakaas aata patapat pudhache bhaag post kar .... mhanaje pudhachya udyogalaa laagataa yeil... visuals and locations dolyaasamor yet aahet... utkantha jaast taanu nakos....

    ReplyDelete
  5. my gooooddddddddneeessssss
    vachunach kata yeto angawar,
    ustsukata wadhaliye kapil,
    sagalyanpramane mi hi tech sanganare pudhacha bhag post kar.

    ReplyDelete
  6. Yes , Good writing..Suspense mast jamla aahe.. Characters pan mast ubhi keliyet .
    Lavkar post kara pudhacha blog..

    ReplyDelete
  7. Classic…hats off to ur imagination! 

    ReplyDelete
  8. Even if I leave aside उत्कृष्ठ वाक्यरचना and अस्खलित मराठी, what remains is a masterpiece...looking forward to "post क्रमशः" part.

    ReplyDelete
  9. Ekdam jabardast...solid suspense create zalay...ekdam peak var ha bhag sampavala aahes..mastach jamaley..pan ata next post tak lavkar..lok vedyasarkhi vat baghat aahet pudhachya postchi

    ReplyDelete
  10. Sahiii.. ekdum mast aahe plot... nehemich light vishyavar lekh lihinara Kapil itka solid suspense plot lihito mhaje maanla pahije haa kharach :-)... pudhcha bhaag laukar lihi...
    best paart mhanje saglya characters chi description ekdum mast lehiliyes... aata rakesh, abhi, rahul aani kunal hyanchi image pakki basli aahe dokyaat

    ReplyDelete
  11. Thanks for all the comments :) will post next part sooon...

    ReplyDelete
  12. अहाहा..!!!!
    सुरवात..अतिउत्तम...जसजशी स्टोरी पुढे सरकते..उत्कंठा अधिकाधिक वाढत जाते...
    लय म्हणजे लईच भारी narration आहे ...
    पटकन पुढचा भाग post कर...

    ReplyDelete
  13. lay bhari...!!!!
    pudhcha bhag laukar post kara...

    ReplyDelete
  14. Lawakar purn kar.
    exciting ahe.........

    ReplyDelete
  15. what a nail-biting story.. do post the next part ASAP before i inform CID :)

    ReplyDelete
  16. Hey ekdam mastach! pudhacha part lavakar lihi :)

    ReplyDelete
  17. Farach zakkass...ekdam peakpointla yeun gosht thambliy...aata pudhe kay yachi utkantha vadhtey....waiting for next post :)

    ReplyDelete
  18. Farach zakkass...ekdam peakpointla yeun gosht thambliy...aata pudhe kay yachi utkantha vadhtey....waiting for next post :)

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete